
येनगाव शिवारातील कृषी सहाय्यकाविरोधात शेतकऱ्यांची लेखी तक्रार बदलीची मागणी
मुख्य संपादक नागेश भटकर
जळगाव जामोद, दि. ४ ऑगस्ट: जळगाव जामोद तालुक्यातील येनगाव शिवारातील शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक श्री. एम. निकम यांच्या कार्यपद्धतीबाबत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित कृषी सहाय्यकांचा कार्यभार काढून त्यांच्या जागी नवीन नियुक्ती करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांमध्ये तसेच इतर नुकसान पंचनाम्यांमध्ये पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही अपात्र व्यक्तींना लाभ देण्यात आल्यामुळे खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.तक्रारदारांनी यापूर्वीही याच संदर्भात अनेक वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याचा दावा केला असून, या प्रकारांमुळे गावात वादाचे वातावरण निर्माण होत असल्याचेही म्हटले आहे.येनगाव शिवारातील शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक श्री. एम. निकम यांच्याकडील कार्यभार तात्काळ काढून अतिवृष्टी पंचनाम्यांची जबाबदारी इतर अधिकाऱ्याकडे सोपविण्याची मागणी केली आहे. सदर तक्रारीवर अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
