
श्री शिवाजी महाविद्यालय, आकोट येथे ‘टीबी मुक्त भारत अभियान’ उत्साहात संपन्न
देवानंद खिरकर अकोला जिल्हा प्रतिनिधी
श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकोट येथे राष्ट्रीय सेवा योजना व जिल्हा क्षयरोग विभाग, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत भव्य जनजागृती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एच. पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सदर कार्यक्रम माननीय जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीष शर्मा यांच्या विशेष मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आला होता.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. भरत र. नागरे, उपप्राचार्य डॉ. अशोक इंगळे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. संतोष पाटोळे, कला शाखा प्रमुख डॉ. संतोष कायंदे, वाणिज्य शाखा प्रमुख डॉ. जी. वाय. वानखडे, प्रा. सुरेंद्र देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा क्षयरोग विभागाचे वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक श्री. गणेश मेघराज राठोड (STS – Senior Treatment Supervisor) उपस्थित होते. श्री. गणेश राठोड यांनी विद्यार्थ्यांना क्षयरोग कसा होतो, त्याची प्रमुख लक्षणे (दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, ताप, वजन कमी होणे), प्रतिबंधात्मक उपाय, शासनामार्फत मिळणारे मोफत निदान व औषधोपचार, ‘निक्षय पोषण योजना’ अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत तसेच ‘निक्षय मित्र’ संकल्पनेबद्दल अत्यंत सविस्तर व सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. टीबी हा असाध्य नसून, नियमित औषधोपचाराने पूर्णपणे बरा होणारा आजार आहे.असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.या अभियानाचा लाभ महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी घेतला असून विद्यार्थ्यांनी टीबी मुक्त भारतासाठी जनजागृती करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. भरत नागरे यांनी केले.
