
शिरपूर पोलिसांच्या आशीर्वादाने की, नाकावर टिच्चून अवैध धंदे जोरात१५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
वाशीम जिल्हा प्रतिनिधी (अनिल जाधव)
मालेगाव तालुक्यातील ऐतिहासिक आणि पवित्र पर्यटन क्षेत्र असलेल्या शिरपूर जैन येथे पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने की, नाकावर टिच्चून अवैध धंदे जोरात सुरू आहेत हे एक कोडेच आहे. शिरपूर नगरात वरली, मटका, जुगार आणि दारू विक्रीसारखे अवैध धंदे उघडपणे सुरू असल्याचा खळबळजनक आरोप भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कलीम रेघीवाले यांनी केला आहे. या संदर्भात थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऑनलाइन लेखी तक्रार करण्यात आली असून, अवैध धंदे बंद न झाल्यास १५ ऑगस्ट २०२६ रोजी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिरपूर जैन हे जैन धर्मीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र असून येथे देश-विदेशातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. अशा पवित्र पर्यटन क्षेत्रात सध्या दररोज लाखो-कोट्यवधी रुपयांची अवैध उलाढाल सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शिरपूर जैन पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेल्या नवीन ठाणेदारांनी या अवैध धंद्यांवर वचक ठेवण्या ऐवजी उलट अशा बेकायदेशीर कृत्यांना खुलेआम प्रोत्साहन दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे गावात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून कोणतीही मोठी अप्रिय घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच शिरपूर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी बालाजी महले हे ऑन-ड्यूटी जाहीरपणे दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालत असल्याचा थेट आरोप कलीम रेघीवाले यांनी केला आहे. अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचा कोणताही वचक राहिलेला नाही, ज्यामुळे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. या त्रासाला कंटाळून गावातील अनेक प्रमुख नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी कलीम रेघीवाले यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत स्वाक्षऱ्यांची मोहीम राबवून या तक्रारीला पाठिंबा दिला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दिलेल्या निवेदनात मुख्य मागणी आणि इशारा दिला की,शिरपूर हद्दीतील सर्व जुगार, मटका आणि अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी. जर गृहविभागाने आणि जिल्हा प्रशासनाने यावर कडक कारवाई केली नाही, तर १५ ऑगस्ट २०२६ रोजी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना घेराव घालून प्रशासनाला जाब विचारला जाईल! या ऑनलाइन तक्रारीच्या प्रती पालकमंत्र्यांसह वाशिमचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक (SP), पोलीस उपअधीक्षक (DySP) आणि शिरपूरच्या ठाणेदारांनाही पाठवण्यात आल्या असून आता गृहविभाग यावर काय ॲक्शन घेणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
