
५ वर्षांपासून पाण्याविना आरोग्य उपकेंद्र! कोयाळी बु.च्या रुग्णांना उन्हात तहान सहन करण्याची वेळ शासकीय निधी खर्च झाला, पण पाणी नाही! रुग्णांना पाण्यासाठी बाहेरची भटकंती – कोयाळी बु. उपकेंद्राची दुरावस्था
जिल्हा प्रतिनिधी रिसोड गोपाल भिसडे
आरोग्यसेवा सर्वांसाठी सुलभ व्हावी या उद्देशाने शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, रिसोड तालुक्यातील कोयाळी बु. येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मात्र गेल्या ५-६ वर्षांपासून मूलभूत पिण्याच्या पाण्याच्या सुविधेविनाच सुरू आहे. उन्हाळ्यातील ४५ अंश सेल्सिअसच्या उन्हात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना, महिला, वृद्ध आणि लहान मुलांना पाण्यासाठी उपकेंद्राबाहेर भटकावे लागत असल्याचा गंभीर आरोप स्वराज्यचे राज्य कार्यकारणी सदस्य गोपाल भिसडे पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भिसडे यांनी केला आहे. दि. १६/०७/२०२६ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात भिसडे पाटील यांनी म्हटले आहे की, दररोज मोठ्या संख्येने रुग्ण या उपकेंद्रात येतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून उपकेंद्र स्थापनेपासून येथे पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.*नेमकी तक्रार काय?* भिसडे पाटील यांनी आपल्या निवेदनात ३ प्रमुख मुद्दे मांडले आहेत:1. *वॉटर प्युरिफायर धूळ खातोय*: शासनामार्फत उपकेंद्रासाठी वॉटर प्युरिफायर/फिल्टर मंजूर होऊन तो उपकेंद्रात पडून आहे. मात्र आजतागायत तो बसवण्यात आलेला नाही.2. *बोअरवेलला मोटारच नाही*: उपकेंद्राच्या आवारात बोअरवेल खोदून पूर्ण झाली आहे. परंतु त्यामध्ये मोटर बसवली नसल्याने त्याचा कोणताही उपयोग होत नाही.3. *निधीचा गैरवापर?*: फिल्टर खरेदीसाठी निधी खर्च झालेला दिसत असताना प्रत्यक्षात सुविधा सुरू नसल्याने शासकीय निधीचा गैरवापर किंवा अनियमितता झाल्याची शंका आहे.*तातडीने कारवाईची मागणी* या प्रकाराकडे लक्ष वेधून भिसडे पाटील यांनी तातडीने उपकेंद्रात वॉटर फिल्टर बसवून सुरू करावा आणि बोअरवेलला मोटर बसवून पाणीपुरवठा चालू करावा, अशी मागणी केली आहे. तसेच फिल्टरसाठी खर्च झालेला निधी प्रत्यक्षात का वापरला गेला नाही याची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून अहवाल सादर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.या मानवीय प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी वाशिम यांनाही देण्यात आली आहे.या प्रकरणानंतर जिल्हा परिषद प्रशासन काय पाऊल उचलते याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
