
परप्रांतीय कंपन्यांची मुजोरी मोडत स्थानिकांना मिळवून दिला रोजगार – मनसेचा धडक हस्तक्षेप अकोला
अकोला प्रतिनिधी संदीप गोपनारायण –
एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील एडीएम अॅग्रो कंपनीमधील स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) प्रभावी भूमिका बजावत मोठा विजय मिळवला आहे. मागील १० दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या सुरक्षा रक्षकांच्या मागण्या अखेर मान्य करण्यात आल्या असून, सर्व जुन्या कामगारांना नव्या कंपनीत समाविष्ट करण्याचे आश्वासन अधिकृतरीत्या देण्यात आले आहे.दि. ८ एप्रिलपासून

एडीएम अॅग्रो कंपनीने जुन्या सेफगार्ड नावाच्या सुरक्षा पुरवठादार कंपनीचे कंत्राट रद्द करून हरयाणातील पॅराग्रीन कंपनीला नव्याने जबाबदारी दिली होती. मात्र, या बदलामुळे मागील १० वर्षांपासून सेवा देणाऱ्या स्थानिक सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करण्यात आले. या अन्यायाविरोधात संबंधित कामगारांनी कंपनीच्या गेटसमोर उपोषण सुरू केले होते.या घटनेची माहिती मिळताच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने पुढाकार घेत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा केली. मनसेच्या जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले, शहराध्यक्ष सौरभ भगत यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एचआर मॅनेजर चंद्रभूषण शर्मा यांना भेटून जुन्या कामगारांची पुनर्नियुक्ती करण्यास भाग पाडले.यासोबतच पॅराग्रीन कंपनीचे संचालक गुरमीतसिंग यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांनी देखील सर्व जुन्या सुरक्षा रक्षकांना नव्या कंपनीत सामावून घेण्याचे लेखी आश्वासन दिले. या निर्णयामुळे उपस्थित कामगारांनी जल्लोष केला आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.या संपूर्ण आंदोलनात मनसे पदाधिकारी रणजित राठोड, सौरभ फाले, शुभम कवोकार, मुकेश धोंडफळे, अमोल भेंडारकर, मंगेश देशमुख, निलेश स्वर्गीव, डॉ. प्रसन्न सोनार, निलेश आगरकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.मनसेच्या ठाम भूमिकेमुळे स्थानिक कामगारांना पुन्हा रोजगार मिळाला असून, परप्रांतीय कंपन्यांच्या मनमानीला रोख बसला आहे.
