
मलकापूर येथे जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन ग्राहकांनी सजग असायला हवे – श्रीमती वैशालीताई गावंडे
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी नागेश सुरगे
मलकापूर : ग्राहकांच्या संरक्षणासाठी ग्राहक संरक्षण कायदे, ग्राहक तक्रार निवारण समिती, ग्राहक मंच सारखे दालने आहेतच मात्र ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेऊन उत्पादक, विक्रेते, व्यापारी वर्ग सोबतच ग्राहकांनी सजग असायला हवे असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्रीमती वैशालीताई गावंडे यांनी जागतिक ग्राहक दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले. ग्राहक संरक्षण अधिनियम च्या तरतुदींची ग्राहकांना जाणीव करून देणे तसेच ग्राहक चळवळीला चालना देणे याकरिता जागतिक ग्राहक दिन निमित्ताने दि. १८ मार्च २०२५ मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय मलकापूर येथे ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मलकापूर चे ना. तहसीलदार चारुशीला चौधरी, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्रीमती वैशालीताई गावंडे या होत्या. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून नगर संघचालक दामोदर लखानी, ना.तहसीलदार श्रीकृष्ण उगले, उपमुख्याधिकारी विठ्ठल भुसारी, पुरवठा निरीक्षक अधिकारी धनश्रीताई हरणे, ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष नगीनदास बैरागी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात शाहीर गणेश कदम व त्यांचा चमूने ग्राहक चळवळी संदर्भात लोकगीते व लोकनाट्य सादर करीत केली. तर याप्रसंगी संगीत शिक्षक अशोक जंजाळकर, तबला वादक दिव्या शंखपाळ, डॉ. मनीषा खर्चे, विद्या पाटील यांनी ग्राहक गीत सादर केले. प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.दामोदरदासजी लखानी यांनी ग्राहक हा बाजारपेठे मधील महत्त्वाचा धागा असून ग्राहकांनी तथा शेतकऱ्यांनी खरेदी करीत असताना घ्यावयाची काळजी व आवश्यक असणाऱ्या बाबी संदर्भात माहिती सांगितली. तर आपल्या अध्यक्षीय भाषणातून नायब तहसीलदार चारुशीला चौधरी यांनी ग्राहकांचे न्याय संदर्भात मूलभूत अधिकार सांगितले. त्याचबरोबर अधिकारांमध्ये मुख्यत्वे वस्तू चा माहिती घेण्याचा अधिकार, सदोष असल्यास न्याय मागण्याचा अधिकार, वापरा विषयी माहिती घेण्याचा अधिकार, सुरक्षितते संदर्भात ग्राहकांचे अधिकार या विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सचिव श्रीकांत अंधारे यांनी केले तर आभार ता.सचिव दिलीप पाटील यांनी केले. या प्रसंगी डॉ.कमलताई काबरा, शेतकरी नेते दामोदर शर्मा, विजय डागा, कमल शर्मा सर, चंदनसिंह राजपूत, रवींद्र जोशी, ईश्वर दीक्षित, धर्मेशसिंह राजपूत, कैलास गणगे, प्रवीण पाटील, विजय कुलकर्णी, राहुल खेडकर, भल्लाजी, बंसीदास वैष्णव, शकील भाई, पंकज मोरे,बबलू जाधव अ.भा.ग्राहक पंचायत, तहसील कार्यालय, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
