
मालेगाव तालुक्यातील हवालदिल वनमजुरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव ; तात्काळ कामे देण्याची मागणी
वाशीम जिल्हा प्रतिनिधी, (अनिल जाधव)
दि,५:-मालेगाव:सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र मालेगाव अंतर्गत काम करणाऱ्या वनमजुरांनी आज थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. गेल्या अनेक महिन्यांपासून हाताला काम नसल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ मध्यस्थी करून न्याय द्यावा, अशी आर्त हाक मजुरांनी दिली आहे.
.
( यवतमाळ जिल्ह्यातील पुसद परिक्षेत्रात काम करणारे वन मजूर रमाशंकर शुक्ला यांनी कामावरून बंद केल्यामुळे विष प्राशन करून आत्महत्या केली आहे या विषयाची वाशिम जिल्ह्यामध्ये पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्हा मजुरांना कामावर घेण्यात यावे असेही निवेदनामध्ये नमूद केले आहे)
वनविभागाच्या विविध रोपवाटिका (नर्सरी), वृक्षलागवड आणि वनसंवर्धनाच्या कामांवर हे मजूर गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून रोजंदारीवर काम करत आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून नवीन कामांचे नियोजन रखडल्याने अनेक मजुरांना कामावरून बंद करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील या मजुरांच्या उपजीविकेचे एकमेव साधन वनीकरणाची कामे असल्याने, सध्या त्यांच्यासमोर तीव्र आर्थिक संकट उभे ठाकले आहे.या संदर्भात वनमजुरांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. रोजगाराचा अधिकार मिळवण्यासाठी शासनाच्या विविध योजनांतून वनीकरणाची कामे तातडीने मजुरांना काम देण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनामध्ये राजू यादव लहाने रतन ज्ञानोजी इंगळे प्रकाश निवृत्ती इंगोले केशव किसन कांबळे यांच्या स्वाक्षरी आहेत
