
शोकाकुल वातावरणात त्या मृतकांवर अंत्यसंस्कार
तिवळी येथे प्रकरण : अग्नीडाव देताना गहिवरले मन
वाशीम जिल्हा प्रतिनिधी ( अनिल जाधव)
शिरपूर : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तिवळी येथील संतोष तुकाराम बकाल वय ३५ या तरुणाने गळफास घेऊन १३ जून रोजी आत्महत्या केली. तसेच त्याची पत्नी, मुलगी एक मुलगा या तिघांचे सुद्धा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.सदर घटनेने तिवळी गावासह परिसरात शोककळा पसरली असून १४ जून रोजी दुपारी दोन वाजता चारही मृतकांवर त्यांच्या शेतामध्ये हजारोंच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.प्राप्त माहितीनुसरा तिवळी येथील संतोष बकाल हे शेतकरी असून ते त्यांचा उदरनिर्वाह अडीच एकर शेतीच्या भरोशावर चालवत होते. त्यांच्या शेतात पक्क्या पाण्याची विहीर असून त्या विहिरीमधून गावांमध्ये नळ योजना सुद्धा सुरू होती. प्रत्येकाच्या घरी या विहिरीवरून पाणी देण्यात आले आहे. अशा पद्धतीने संतोष बकाल यांचा सुरळीत चालू असलेला संसार त्यांच्या आत्महत्याने होत्याचा नव्हता झाला. १४ जून रोजी तिवळी येथील त्यांच्या शेतात संतोष बकाल, पत्नी उषा व मुलगी जानवी, मुलगा सोहम या चारही जणांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी हजारोच्या संख्यने नागरिकांची उपस्थिती होती. अग्नी देत असताना मुलाला त्याच्या आईजवळ तर मुलीला वडिलाजवळ अग्नी देण्यात आली. अशावेळी उपस्थित लोकांच्या डोळ्यात मात्र अश्रूच्या धारा आल्या होत्या.
